Sunday 31 May 2015

अनुभूति: विडंबन आणि बाष्कळ गीतं


कोणतीही चांगली गोष्ट, कालांतराने कालबाह्य होते. त्यामधील दोष लक्षात येतात, त्यावर टीका ही होतेच. हसत हसत टीका करून आपण त्याची खिल्ली उवतो. काहीसा हाच प्रकार मनस्विनीच्या 'अवघे पाऊणशे वयमान' कवितेत दिसतो. आजची स्वतंत्र स्त्री, आपली हुशारी, चलाखी आणि तिला आलेली जागृती, अगदी हिरीरीने प्रदर्शित करण्याची एकही संधी फुकट घालवत नाही. ह्या कवितेतील नगरसेविकेचे वर्णन विडंबनात्मक आहे. नगराची सेवा सोडून इतर show off मध्ये ती मग्न आहे. नगरसेविकेच्या नातवाची reaction पहाण्यासारखी आहे.

शनीचा उपग्रह 'रिया' बराचसा पृथ्वी सारखा असल्याने, शास्त्रज्ञांनी भविष्यात पृथ्वीवरच्या मानवाला रहाण्या योग्य ग्रह सुचविला आहे. मनस्विनिच्या व्यंगात्मक कॉमेंट्स पहा, उलटा फिरणारा हा ग्रह जो ज्योतिष शास्त्रात त्रास्दायाक मानला जातो, त्यावर लोक असतील तर ते आमच्या लांचखोर राजकाराण्यांसाराखेच असणार. पृथ्वीवरील अशा लोकांना रिया ग्रहच योग्य असा वाचकांचा समज होईल पण मनस्विनी उलट सुचवते की लाचखोर लोकांचा रियावर कसा निभाव लागणार?

अत्यंत भावुक होऊन ती, 'आदर्श घोटाळा' करणारे अनेक लांचखोर अधिकारी आणि राजकारणी यांवर संतापते. खरा प्रश्र्न तिला पडला आहे, कर्तव्यबुद्धी नसलेली ही मंडळी, शहीद जवानांना दिखावटी सन्मान तर देतात पण अशा प्रसंगातही काळी कर्तुते करायला कचरत नाहीत. म्हणून त्यांची नसलेली इज्जत काढायाला ती मागेपुढे पहात नाही.

निव्वळ गम्मत म्हणून लिहिलेली 'बाष्कळ गीते' पण मनस्विनीचा खोडकर टीका करण्याचा माध्यम ठरतो. हसत हसत ती वर्मावर बोट ठेवते आणि वाचकाला बऱ्यांच वेळानी त्याचा अर्थबोध होतो. अनुभूति काव्यसंग्रहाचा शेवट करताना जे 'सद्यस्थिती' भजन ती गाते ते भजन नसून सद्यस्थितीचा उपहास आहे. वाचा आणि स्वतः आनंद लुटा!

Saturday 30 May 2015

अनुभूति : टीचरची भूमिका

मनस्विनी teacher म्हणून तिच्या जवळपासच्या समाजाकडे पहाते, तेव्हा त्या समाजाची वैशिष्ठ्ये व मुले वाढविण्याच्या त्यांच्या पद्धती पहाते. अबोध, निष्पाप मुले ही त्यांच्या पालकांचे प्रतिबिंब असतात. मुलांच्या खास गरजा तिच्या निरीक्षणात आल्या. या सर्वाचे हुबेहूब वर्णन या सत्यकथेवर आधारित कवितांमध्ये साफ दिसते.

मुंबईत व्यापारी वर्ग बराच मोठा आहे. त्यांचे फायद्याचे व्यवहार न कळत त्यांची मुले कशी आत्मसात करतात हे बघण्याजोगे आहे. 'अखेर व्यापारीच' असं आपणही म्हणाल. स्वतः च्या अधुपणान स्वतः च्या मुलांनाच त्रास देणाऱ्या व्यक्ति किंवा मनाविरुद्ध समाजाच्या बंधनाने चिडणारा बाप असो, 'हाच मुलाचा बाप' आणि 'असाही जन्मदाता' या कावितातांमध्ये भेटतो. 

टीचरच्या कडक पण प्रेमळ शिस्तीने समज आल्यावर सुधारलेले तिचे विद्यार्थी आपल्याला 'अशीही कृतज्ञता' किंवा 'स्वगत यशानंतर' येथे भेटतात. मनस्विनीला असं मिळालेलं प्रेम हीच तिची गुरुदक्षिणा ती मानते. सामाजिक प्रतिष्ठेपायी आपल्याच मुलांचं होणारं नुकसान 'चूक कुणाची भोग्तं कोण?' इथे जाणवते. त्यांच्या चुकीच्या धोरणांनी, कित्येकवेळा मुलं आपल्या आवडीचं करता (शिकता) येणार नाही म्हणून निराश होतात. कधी नशिबाचा फटका बसल्यानं निर्दोष मुलांना होणारी शिक्षा मनस्विनीला धक्का देते आणि तिच्या मनात 'असं कां?' हा प्रश्र्न उभा रहातो. 'गुड मेमरी'ही साधी कविता तर 'खुळ्या मुली' ही स्त्रीच्या आत्मकेंद्री असण्याच्या सवयीला चिमटा काढणारी कविता आहे. जुळ्या मुला-मुलींच्या जन्मतः गरजा आणि सवयी 'माझे शोधन' मध्ये ती नमूद करते.  

मुलांची मोकळी मने नि जगातील अलिखित पद्धती 'रीत ही जगाची' मध्ये आपल्या पुढे येतात. स्त्रिविवाह किंवा विवाह उशिरा होण्यानं तिची होणारी कुचंबणा येथे मनस्विनीने प्रकर्षाने मांडली आहे. समाजाच्या रीती कश्या आडव्या येतात याचे उदाहरण 'रमा कुंभार' आहे. काही लोकं स्व-खेरीज कशाचाही विचार करत नाहीत हे पाहिल्यावर मनस्विनीच्या मनात हे लोकं 'स्वार्थी की अडाणी' असा प्रश्र्न उभा रहातो. तरीही तिचे निरीक्षण सतत चालू आहे. तिने काढलेले निष्कर्ष तिची विचार समर्थता दाखवते.

सामाजिक रूढी, रिती रिवाज, समज आणि त्यांचे विपरीत परिणाम झालेले आपल्याला दिसतात. ती चूक नजरेस येताच ती त्वरित सुधारावी म्हणजे अनर्थ टळतो अशी शिकवण मनस्विनी देते. नुसती बडबड करून, टीका करुन मनस्विनी स्वतः काय करते असा प्रश्र्न कदाचित आपल्याला पडेल. शक्य तेव्हा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये समजौता घडवून आणून प्रश्र्न मार्गस्थ करते, दोन्ही पक्षांना emotional support पुरवते.

या कविता अनुभूति काव्य संग्रहात वाचा आणि मुलांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्यात तर या कविता लिहिणे सार्थकी लागले असे मला वाटेल. Facebookवर तुमचे अनुभव / मतं लिहायला कचरू नका, सर्वांना उपयोगी पडतील.



 

Friday 29 May 2015

अनुभूति: मी feeling बद्दल


मनस्विनी ज्या प्रसंगाचा, व्यक्तीचा विचार करते त्यांत ती स्वतः ला डूम्बवते ही तिची समर्थता, विशेषता. वाचकांना तो तिच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग भासतो. 'मी' भोवती फिरणाऱ्या तिच्या कविता 'मी हसले', 'अविस्मरणीय', 'भित्री' . स्वतः बद्दलचे, स्वतःशीच केलेले dialogues आहेत. हंसरी माणसं सर्वांनाच आवडतात. गंभीर स्वभावांच्या लोकांना दूर ठेवलं जातं. मनस्विनीला या गाम्भिर्यातही सौंदर्य दिसतं.

कोणती ही जबाबदारी म्हटलं की जोखीम आलीच. त्यासाठी स्वतःच्या मनाची घडण कशी करायला पाहिजे, हे ती सांगते. आईची जबाबदारी आणि महत्त्व तिच्या तोंडून निघते. 'मी' आणि 'ऋणानुबंध' हे न उकलणार कोडं (प्रेम) तिला विचार करायला लावतं. इथे वाचक बुचकळ्यात पडतो. 'स्वप्नातील स्वप्न'ची उकल ती फारच वेगळ्या गोष्टीने करते तेव्हा मजा वाटते. 'शेतकरी' आणि 'शेतकरी मी' किंवा 'गुंता विचारांचा' आणि 'क्षणिक जीवन जगायला' या कवितांत सत्याची उकल आहे. खरोखरीचा सूक्ष्म विचार केला तर आपल्या मनाचीही उलाघाल मनस्विनीच्या मनाच्या उलाघालीपेक्षा वेगळी होत नाही. एवढी ती मनःपूर्वक रंगवते आणि सत्य सहज समजते.

ती एक स्त्रीच आहे. भावना तिच्या जीवनाचा आधार आहे. 'ध्यास माझ्या मना' या कवितेत हे दिसते. तिला वेदना होतात, त्या न समजलेल्या प्रेमाच्या भावनांच्या! या कवितेत ती प्रेमाची व्याख्या करते, सार सांगते आणि मार्गही दाखवते. तिला आकलन झालेले जगातील सत्य सांगताना ती स्वतः ला समजावते की पुन्हा उभारी धर, प्रेम गवसेल. ते अमीट आहे.

स्वप्न ही खरं तर सामान्य गोष्ट. बहुतेकांना त्याचा अनुभव आहे पण मनस्विनीला नाही. तो मिळावा ही तिची साधी आशा पण ती पुरी झाली नाही म्हणून ती रडत नाही तर न पडलेल्या स्वप्नांचं नातं स्वतःच्या यशाला देते. किती वेगळी कल्पना?

तरुण वयात अनेकांच्या सुवर्णसंध्या विनाकारण हुकतात. अशीच हुकलेली संधी अचानक तिला मिळते. 'स्थलांतर' या कवितेत तिचा आशावाद व हुरूप आपण कवितेतच वाचा. वृद्धावस्थेकडे झुकून 'देई रे विसावा' असे सृष्टीकार्त्याला विनवते त्यावेळी तिला 'संभ्रम' पडतो यात ती चमचमती दुनिया, चमकणारे तारे आणि तरुणांच्या झालेल्या गैर समजुती यांची सांगड घालते आणि अधिकार वाणीने म्हणते सन्मान मागून मिळत नाही कर्तृत्व ते खेचून आणतं.

या सर्व कवितांमधील आत्मीयता वाचकाला वेगळ्या स्थरावर नेवून ठेवते. मी feeling हा जणू या कविता संग्रहाचा आत्माच आहे. self discoveryच्या तुमच्या प्रवासात मनस्विनीला तुमची जोडीदार करा आणि 'अनुभूति' संग्रह जरूर वाचा.


 

Thursday 28 May 2015

अनुभूति: पर्यावरण special



पर्यावरण आणि मानसिकतायांचा निगडीत संबंध अअहे. यांत्रिकीकरण आणि सामग्रीची प्रचंड मागणी हे प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. विज्ञानाने जसे मानवतेचे कल्याण केले तशीच त्याची हाव ही वाढवली आहे. आज प्रदूषण सर्वत्र आहे. प्रदूषण विज्ञानाने नव्हे तर माणसाच्या लोभीपणामुळे आहे, प्रक्रिया पूर्णपणे पार पाडून जर waste disposal नीट केले तर प्रदूषण कसे होईल? ही प्रक्रिया खर्चाची आहे आणि भांडवलशाही मनोवृत्तीत पर्यावरणाची उपेक्षाच होते. लाचखोर राजकारणी, अधिकारी व लोभी कारखानदार याला हातभार लावतात. प्रत्येकाचा स्वार्थ त्यांत दडलेला आहे आणि दिवसेन दिवस पर्यावरणाला तडाखे बसत आहेत.

ऑटोमोबाईलचा धूर, हवा प्रदूषित करते तर रसायनी कचरा पाणी दुषित करतो. जळणासाठी व कागद बनवण्यासाठी झाडे कापून वनाची, वन्य प्राण्यांची खच्ची होते. पृथ्वीचे संतुलन बिघडते. खनिज द्रव्व्ये व कोळश्याच्या अधिक वापराने जमिनीची धूप तर होतेच पण तापमान देखील वाढते. त्याकारणी हिम वितळून समुद्राची पातळी वाढतेय. भूकंपांचे प्रमाण आणि त्सुनामीची तीव्रता वाढली आहे.

प्रदूषित वातावरणात मनेही प्रदूषित होतात. मोहाला आवर न घालणं, बेफान वागणं, कशाचीच रया न ठेवणं ई. 'राजकारणी व्यापार' करणारा politician, पर्यावाराचा खरा दुश्मन आणि त्यावर मनस्विनी टीका करते. त्सुनामी आल्यावर तिच्या मनावर भारी परिणाम झाला आणि ती त्याचा उल्लेख 'तुझी अवकात' कवितेत करते. हिमालयाकडे गंगा वाहू शकते कां? पण उपहासाने मनस्विनी म्हणते की असंतुलित पर्यावरणाचा परिणाम झालेल्या स्थितित हे कदाचित शक्य होऊ शकेल.

जन्मदात्याला ती बालीश प्रश्र्न विचारते - अनंतातील हालचाली, satellite नं दाखवलेली चिखलातील खेडी, अंतराळातील कचरा, जो पृथ्वीला धडकणार होता, तिचा नाश करू इच्छित होता या सर्व गोष्टी तू का करत आहेस? माणसाने विविध प्रकारे तुझ्या राज्यात घुसखोरी केल्यानं तू रागावला आहेस का? शेवटी रागावलेल्या पित्याची बालकाप्रमाणेच क्षमा मागते आणि राग सोडायला सांगते. या कावितांद्वारे ती पर्यावरणाचा नाश न व्हावा म्हणून विविध भूमिकेतून आपले विचार सादर करते आणि जनजागृती करते.


 

Wednesday 27 May 2015

अनुभूति: चेतावणी / सावधानता


अध्यात्मिक परंपरेचा भारत हा शांतताप्रिय देश आहे. आक्रमण करणं हा इथल्या लोकांचा स्वभावच नाही. सरळ, साध्या माणसांचा देश निसर्गाने परिपूर्ण आहे. पण साडे-पांचशें वर्षांच्या गुलामगिरीचे दुष्परिणाम आजही या भूमीत दिसतात. निव्वळ 'अनुकरण' हा त्याचाच परिणाम आहे. कोणत्याही गोष्टीचे मूळ काय? ते आपल्याला कितपत उपयोगी आहे, याचा विचार न करता दुसऱ्याची हुबेहूब नक्कल करणं फार भारी पडतं. परकीयांचा प्रभाव येणं स्वाभाविक असलं तरी अंध, बेशिस्त अनुकरण घातक ठरतं. त्यामुळे अर्धवट रिती रिवाज, कल्पना, खाद्य, कपडे वापरणं किती योग्य आहे असा प्रश्र्न मनस्विनी विचारते. पारंपारिक सद्यस्थिती आणि foreign विचारधारा यांच्या मिश्रणाने समाज रचनेत मोठ्ठा स्फोट होऊ शकतो. तो टाळण्याची सावधानता बाळगणे जरुरीचे आहे.

आज मुली खूप शिकत आहेत, ज्ञानाच्या या उघडलेल्या कवाडांनं तिनं जिद्दीनं पुढे जायला हवं पण त्यात अतिरेक नको. हे मत ती 'सावधान पुरन्ध्रींनो' कवितेत स्पष्ट करते. न जुमानण्याच्या परिणामाची आठवण करण्यास कचरत नाही. कशाच, किती आणि कसं अनुकरण करायचं हे ज्यानी त्यानी ठरवायचं आहे त्यासाठी मुलं लहान असल्यापासून त्यांच्यावर भारतीय संस्कार असणं जरुरी आहे. तिथेच पालकांची खरी जबाबदारी वाढते. कच्चे संस्कार कठीण प्रसंगात ढासळतात आणि माणूस डगमगतो. कोणते ही चांगले काम तडीस नेण्यास बराच काळ नि कष्ट खर्चावे लागतात. insant results संस्कृतीत लोक short cut घेतात आणि पस्तावतात. 'संस्कार कश्याला हवेत' या कवितेत हेच ज्ञान संपादन करायला पक्के संस्कार लहानपणीच व्हायला हवेत हे ती आवर्जून सांगते.

आयुष्यात खोटं बोलणं / खोटं वागणं खूप सोपं आहे पण ते अर्ध्या घटके पुरतं यश देतं. खऱ्याचा मार्ग बिकट /खडतर तरी प्रदीर्घ काळ यश देणारा, शाश्वत आणि त्रिकाळाबाधित आहे. त्यासाठी संस्कार जरूरीचे आहेत आणि ते घरातच होतात. शिस्त ही वैयक्तिक आहे. ही सुधारणा व्यक्तीव्यक्तीत झाली पाहिजे कारण शिस्त व्यक्ती, कुटुंब, समाज मग देश या टप्याटप्याने होते म्हणजे मग देशात परिवर्तन येईल. हेच सूत्र पकडून मनस्विनी संपूर्ण संग्रहात वेगवेगळ्या पायऱ्यांवर सावधानता / चेतावणी देते. कान उघाडणीचे तिचे प्रकार कधी तीव्र आलोचना तर कधी शहाण्याला शब्दाचा मार या पद्धतीचे आहेत.

आज जे 'वास्तव' समोर दिसतं त्यावर मनस्विनीचा विचार वेगळा आहे. आपल्यावर जर कोणी अन्याय केला तर प्रतिकार करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार ती अधिक करते. नियतीच्या अन्यायाला शांत बुद्धीने, धीटपणे सामोरं जायला सांगते. त्यावेळी पाळायचे नियम सांगते, आणि परिणाम सांगते. इथे तिची स्थितप्रज्ञ अवस्थेकडे वाटचाल दिसते. असत्यापुढे नांगी टाकू नका ही चेतावणी ती देऊ पहाते.

मनस्विनी याच जगात रहाते त्यामुळे बदलती समाजाची चित्रे पहाते. कमकुवत भारतीय मनांवर परकीयांचा झालेला परिणाम तिला खटकतो. गुलामगिरी सदृश भासणाऱ्या मनोवृत्तीवर 'इंग्रचीचा पगडा' कवितेत हातोडाच मारते. म्हणजेच आजच्या मुला मुलींची वर्तणूक, फाजील आत्मविश्वास, कुणालाच न जुमानण्याची वृत्ती, तुटक नाते संबंध (आजा-आजी, आई-वडील, बहीण-भावंडे) याचे मूळ, विचाररहित अनुकरण आहे. आजची पिढी स्वातंत्र्यात जन्म घेतलेल्या भाग्यवान मुला मुलींची आहे. ती आता तरुण वयात आली आहे त्यामुळे त्यांनी या कवितेतील मुद्यांचा विचार करावा व सावधानता बाळगावी ही चेतावणी मनस्विनी मनापासून देते.

संपूर्ण देशाच्या स्थरावर पाहिलं तर अयोग्य राजकीय धोरणांनी व निव्वळ (परदेशीय) अनुकरणाने पर्यावरणाची हानी झाली आहे. पर्यावरणाच्या विषयी पुढच्या ब्लॉग मध्ये लिहिते. तोवर अनुभूति संग्रह वाचा आणि facebook वर कॉमेंट्स लिहा.

Facebook page:  www.facebook.com/pages/मनस्विनी/693942534067869



Tuesday 26 May 2015

अनुभूति: बोध


मनस्विनीच्या विचारात नि कल्पनाशक्तीत विविधता तर दिसतेच, त्याखेरीज 'अजून काहीतरी' जाणवतं. जगाच्या बऱ्या-वाईट अनुभवातून काहीतारी बोध ती आपल्याला घ्यायला सांगते . पुन्हा पुन्हा त्या शक्तीला, की जी आपल्या आयुष्याचा मोठा भाग आहे, त्याला विसरू नका. वळणावळणाने, अनेक कवितेतून, अनेक प्रकारानं ती आपल्या आत्म्याची उन्नती, प्रगती, मुक्ती करण्याच्या ध्येयाची आठवण देते. कधी आई, कधी मैत्रिण तर कधी teacher बनून ती आपली भूमिका निभावताना दिसते.

'आत्म्याचे स्वगत' या कवितेत भूतलावर तिला दिसलेले मार्ग ती सांगते आणि योग्य मार्गानेच तू जा असे सुचवते. माणसाने केलेली हुशारी ती नमूद करते आणि शेवटी व्यवहारी जगाची रीत दाखवून, निर्गुण निराकाराला न विसरण्याचा सल्ला देते - तुम्हा आम्हाला नाही, स्वतःच्या आत्म्याला! अनेक वेळा आपल्या शब्दांचा अनर्थ होत असतो. लहान मुलं तर या बाबतीत कोवळीच आहेत. आई का रागावली हे न कळणाऱ्या छोट्याश्या मुलाला ती समजावते, एवढेच नाही, तू कुठे चुकतो आहेस हे कल्पक गोष्टीतून त्याला युक्तीने सांगते, 'अर्थ लावू या शब्दांचा' या कविते द्वारे.

'भाग्यवान' कुणाला म्हणायचा यासाठी ती स्वतःच्या लहानपणीची आठवण सांगून, आज भाग्यवान कुणाला म्हणायचं याचं विश्लेषण करते. भारतीय संस्कृती, आदर - मग तो विद्येचा असो, अनुभवी व्यक्तींचा असो, वृद्धांचा असो - करायला सांगते / शिकवते. दोन माणसं एकत्र आली की वाद-विवाद, भांडणं हे गृहीतच आहे, याचं प्रतिबिंब म्हणजे 'छत्तीस नको त्रेशष्ठ हवे' आहे. वडीलधाऱ्यांनी आपल्या मुला मुलींशी कसं वागायला हवं, मार्गदर्शन करायला हवं आणि तरीही त्यांचा आत्मसन्मान न दुखावता! कारण, हे नातं पूर्व जन्मीचं असलं तरी या जन्मी पृथ्वीवर प्रत्यक्षात येणारं आणि नितळ प्रेमाचं आहे, हे ती मानते.

माणसाला 'मर्यादा' आहे, ती त्याने ओलांडायची नाही कारण ती विश्वचालकाच्या व्यवस्थापनाखाली आहे. याच जाणीवेतून श्रद्धा निर्माण होते आणि अज्ञानाने अंधश्रद्धेत रूपांतरित व्हायला वेळ लागत नाही. हे मनस्विनी 'नको अंधश्रद्धा' कवितेत सांगते. माणसाला होणारा मोह, त्याचे संस्कार धुवून टाकतात हे 'मोह की संस्कार' या कवितेत आपणच वाचा. मोह हा वैयक्तिक आहे. त्यातूनच चांगल्या चांगल्या गोष्टींचे कसे 'तुकडे तुकडे' उडतात या कवितारूपाने मनस्विनी एक बोध देण्याचा प्रयत्न करते.

कोणत्याही चांगल्या कामाचे / कर्माचे फळ उत्तमच असते. याची जाहिरात न करता ही नियती त्याची नोंद करत असते व त्याचे फळ न सांगता तुमच्यापर्यंत पोहोचवते. समाजात अनेकदा येणारा अनुभव असा आहे की तुमच्याजवळ जे नाही तेच नेमके समाजाला हवे असते. म्हणून 'प्रयत्न का वृथा?' असे मनस्विनी विचारते. प्रत्येक जीव वेगवेगळ्या कार्यासाठी, त्याच्या कर्मानुसार जन्माला येतो असे संस्कृती मानते, मनस्विनी जाणते. एका वेगळ्याच गणिती पद्धतीने तिने 'समाजाचे गणित' मांडून ते सोडवले आहे. समाजाचे सर्वमान्य नियम पाळण्याचा बोध तिने दिला आहे.

अति गर्व करणाऱ्या स्वतःला अत्यंत शहाणी समजणाऱ्या वृद्धेला एक 'मच्छर' कसा धडा शिकवतो. किरकोळ शत्रूला ही दुर्लक्ष्यू नका हा मनस्विनी बोध देते.

व्यक्तिव्यक्तीची 'मानसिकता' अलग अलग आहे. समाजानं कितीही प्रयत्न केला तरी ती बदलणं अवघड आहे हे तिला जाणवतं. मुला मुलींच्यातील केलेला फरक हे याचेच एक उदाहरण आहे. कोणत्याही ग्रंथाचे किंवा गोष्टींचे नुसतेच वाचन नसावे हे 'नको पारायणे व्यर्थ' या कवितेत दिसते. प्रयत्नपूर्वक केलेलं कोणतं ही काम आपल्याला चांगलच देऊन जातं, यावर मनस्विनीचा दांडगा विश्वास आहे. घंटा वाजवत, देवळांना भेटी देत, यात्रा करत फिरण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपलं विहित कर्म मनापासून करण्याचा बोध तिनं घेतला आहे.

फार पूर्वेकडील त्सुनामीन घातलेला गोंधळ तिनं पाहिल्यावर, निसर्ग हाच खरा मोठ्ठा शिक्षक आहे याची तिला खात्री झाली. तिच्या मनावर खोल कुठेतरी याचा आघात झाला. तिच्या मनावर दडपण आलं. माणसानं कितीही हुशारी केली तरी त्याची 'अवकात' किती हे तिच्या लक्षांत आलं. आपल्याला निर्माण करणारी शक्ती (परमेश्र्वर) किती श्रेष्ठ आहे हे ती अनुभवते. येथल्या प्रत्येकाच्या मूळांचं गूढ तिला सुटत नाही म्हणून ती 'त्या' शक्तीला प्रणाम करते.

'अनुभूति' मधील विविध कवितेतून काहीना काही बोध मिळतो. त्या बोधाचा आपणही विचार कराल असा तिचा विश्वास आहे. तर चला वाचू अनुभूति - एक आगळा कविता संग्रह. Facebook वर कॉमेंट्स जरूर लिहा.


 

Monday 25 May 2015

अनुभूति: निरागसता


निरागसतेचे वर्णन हे मनस्विनीचे वैशिष्ठ्य आहे. व्यक्तितील मासुमियता, पवित्रता, सहजता, नैसर्गिकता आणि भोळेपण हे सर्व निरागसतेत मोडते. निरागसता व्यक्तिमत्वाची किंवा प्रसंगाची असू शकते. ती वाचकाला आपल्या लहानपणीच्या स्मृतीत घेऊन जाते. निरागसता आणि अनभिज्ञता go hand in hand. 'बाहुली' वरचं प्रेम असो की आईच्या तोंडून निघालेली 'आशीर्वादाष्टक' असोत त्यांत तोच पवित्र भाव दिसतो. चोर कसा ओळखायचा हा छोट्या मुलाचा 'अदभुत प्रश्र्न' किंवा picture perfect गावाचं वर्णन निरागसतेची विविध रूपं आहेत. स्नोफॉलचा निस्खळीत आनंद लुटणे, 'शापित सौंदर्य' मधील मनापासून केलेले स्वगत मनस्विनीची निरागसता दर्शवते. या कावितेतील वर्णने जरी वास्ताविकातेपासून थोडी दूर असली तरी मनाला संतोष देऊन जातात.

'धुपकन अचानक' पडणं जितकं नैसर्गिक / स्वाभाविक आहे, तितकच कोण, कुठे, कधी, कसा पडेल हे सांगण कठीणच आहे. गधे पंचविशीतील प्रेम यात, 'का?' प्रश्र्नच उद्भवत नाही कारण ते कुठेही, कधीही, कुणावरही, कुठल्याही कारणानं बसतं. प्रेमाची ही निरागस सुरुवात आहे. प्रेम करण्यातूनच सुसंस्कृत समाजात लग्न रुढ झाले. व्यक्ती जरी निरागस असल्या तरी समाज व्यवहारी आहे, त्यामुळे निरागसता डागाळली जाते आणि लग्नासारख्या पवित्र संस्काराचा बाजार मांडलेले दिसतो. याची मीमांसा मनस्विनी 'मी लग्न करतो' या कवितेत सुलभ प्रकारे करते.

भारतीय संस्कृतीचं सर्वोच्च ध्येय 'मुक्ती' आहे. मुक्ती ही कल्पना जरी निरागस असली तरी पूर्वकालीन चार आश्रम संकल्पनेतून, व्यवहारी दुनियेतील वाटचाल अवघड होते. म्हणूनच 'आत्म्याचं स्वागत' सांगताना निर्गुण निराकाराचा ध्यास कधीच सोडायचा नाही असे मनस्विनी सुचवते.

सौंदर्यात निरागसता आहे, पण 'शापित सौंदर्य' ही reality आहे. मनस्विनीने या कवितेत आशावाद दाखवला आहे की, या चुका दुरुस्त होऊ शकतात आणि हा पण एक तिच्या स्वभावाचा निरागसपणाच आहे.

मनस्विनी जेव्हा चौथ्या पिढीतील परदेशवासी १६-१७ वर्षांच्या मुलाने केलेल्या, 'गाव माझ्या पणजोंचा' ह्या निरागस वर्णनात मायभूमीची ओढ दाखवते, तेव्हा वाचक गदगदतो. मुलगा जरी तीन पिढ्या भारतापासून दूर असला तरी भारताची नैसर्गिक ओढ, त्याची नाळ मायभूमीशी जोडलेली आहे हेच दाखवते.

स्वपनाळू मनस्विनी जरी झुंझार असली, जगाच्या वास्तविकतेला सामोरी जात असली तरी तिची निरागसता ती कायम राखून आहे. तिच्या निरागसतेचा आस्वाद 'अनुभूति' काव्य संग्रह वाचून घ्या. facebook वर कॉमेंट्स करून तुमचे मत मांडा.
Facebook page:  www.facebook.com/pages/मनस्विनी/693942534067869

 

Sunday 24 May 2015

अनुभूति: सद्यस्थितीबद्दल


नमस्कार! कलियुगात पिडलेली माणसं पुढे येणाऱ्या सत्य युगाची, डोळे लावून वाट पहात आहेत. कलियुगात झालेली हानी म्हणजेच खालावलेली नीतीमत्ता, विस्खळलेली समाजरचना, मंदावलेली बुद्धी इ. यांची जाण मनस्विनीला आहे. भाषा माणसानेच तयार केली, तीसुद्धा बदलली. भाषा म्हणजे वर्णाक्षर नाहीत तर भाषेतून प्रतीत होणारा अर्थ तोच ठेवून वाक्य रचना बदलण्यात केलेली हुशारी! दोन नकार वापरून होकार आणि होकारार्थी नकार देणे सर्वमान्य झाले आहे. भाषेचा वापर बदलला आहे.

कोणालाही चांगल्याची संवय लागली की दुसरं काहीच पसंतीला येत नाही. मग मुंबई-लंडनसारखी सुखसोयीयुक्त शहरेही त्याला अपवाद नाहीत. 'चक्रव्यूह' कवितेत याचेच वर्णन मनस्विनी करते. तेथील विविध जमातींची, विविध राज्यातील माणसं तिथं रमतात आणि त्यातही त्यांचा 'दर्ज्या' दिसतो. कोणी चांगल्या विचारांचा तर कोणी मोही दुष्ट अशा हीन दर्ज्याची माणसं तिला भेटतात. तिच्या मनातील प्रश्र्नाचं उत्तरही तिला मिळतं.

देशातील परिस्थिती समाजाच्या मनोवृत्तीतून जाणवते. उलट दिशेला समाज वाहतोय याची कल्पना मनस्विनी पवित्र गंगानदी उलट हिमालयाकडे कशी वहाते आहे हे 'हिमालयाकडे गंगा' कवितेत सादर करते. 'जीवन गौरव पुरस्कार' या कवितेत ही व्यथा प्रकर्षाने जाणवते.

'काळ बदलला' आहे - काळ बदलला हे कवितेचे नाव आहे. स्त्रियांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला आहे पण मुलगी, पत्नी, आई म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्याबद्दल मोठ्ठा सवाल तिच्यापुढे आहे. नोकरी, घर आणि त्यानुसंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडताना तिला आपली कर्तव्ये टाळून भागणार नाही उलट अधिक जबाबदारीनं वागावं लागेल. नवयुवकांना सहज मिळणारा पैसा योग्य कामी लावायला पाहिजे ही अनुभवी मनस्विनीची शिकवण आहे. प्रत्येकानं आपले आयुष्य कर्तव्यपूर्ती करूनच सुखी व समाधानी करावं ही मनस्विनीची कळकळ आहे.

'भन्नाट शहर' ही मार्मिक कविता अर्थपूर्ण वाचली तर त्यातील गर्भित अर्थ अधिक चांगला समजेल.

मनस्विनीला आधुनिक मुला मुलींकडे जबाबदार नागरिक म्हणून पहाताना पडलेला प्रश्र्न, विवध उदाहरणांने मांडला आहे आणि शेवटी आधुनिकता कशात दिसते तेही स्पष्ट लिहिले आहे. समाजातील हा मोठ्ठा वर्ग कान देऊन ऐकेल याची तिला खात्री आहे. सत्य जरी बोचर, कटूच अस तरी ती ते उघडपाने बोलली आहे. सर्वच लोकांना पैसा झटपट नि खूप हवा आहे. त्यांची मनोधारणा कमालीची बदलली आहे. त्यासाठी नीती-अनीतीच्या पुसट रेषा ते सहज हलवतात. 'परीक्षा' मधील मुलीचा choice याचं उदाहरण आहे. यातूनच पुढे त्यांच्याच बाल-गोपालांची 'परवरीश' करताना चुका घडतात आणि वेळ निघून गेल्यावर आत्मचिंतन व पश्र्चातापाशिवाय दुसरं काहीच उरत नाही.

आजचे राजकारणी धंदा म्हणून राजकारण करतात, संधीचा फायदा उठवतात. जुनी देशभक्ती त्यांच्यात दुरूनही अनुभवाला येत नाही. 'राजकारणी व्यवहार' मध्ये मनस्विनी त्यावर जोरदार टीका करताना दिसते.

वृद्धांना सन्मान देणे ही भारतीय संस्कृती आहे. याचा आधार घेऊन केलेल्या 'ठराव' कवितेत तरुण पिढीच्या वागण्यातून परस्पर विरोधी प्रतिक्रिया ती अनुभवते. समाजाचे झालेले 'विदारक रूप' ती टिपते. देशाच्या केल्या गेलेल्या धुपेनंतर तेथील माणसं कशी अधिक कृपण झाली आहेत हे तिला जाणवतं. मनाच्या अस्थिर अवस्थेत ती प्रश्न विचारते आपले संस्कार कुठे हरवले? या मनोवृत्तीचे किळसवाणे रूप पाहून मनस्विनी स्वतः वर खूप चिडली आहे आणि तिने त्या मनोवृत्तीला 'ठेचा लवंगी मिरचीचा' चाखवला आहे. कुणाचीही भाडभीड न ठेवता एका झुंजार मनस्विनीचा अवतार इथे दिसतो.

या सर्व कवितांचा आस्वाद घेण्यास 'अनुभूति' काव्य संग्रह जरूर वाचा आणि facebook वर अभिप्राय कळवा.

Facebook page:  www.facebook.com/pages/मनस्विनी/693942534067869


Saturday 23 May 2015

अनुभूति: प्रश्र्न तक्रार सिलसिला


नमस्कार! थोडासा तरी विचार करणाऱ्या व्यक्तीस प्रश्र्न हा पडतोच. त्याचं उत्तर शोधण्यासाठी त्याला खूप उप-प्रश्र्नांची मदत घ्यावी लागते. कधी प्रश्र्न सुटतात तर कधी सुटत नाहीत, मग तो त्याबद्दल तक्रार करतो. पुन्हा ती तक्रार दूर करण्यासाठी प्रश्र्न उत्तर, प्रश्र्न उत्तर हाच सिलसिला सुरु होतो. मनस्विनीला समाजातील मोही व्यक्तींचा राग आहे. तिला प्रश्र्न पडतो की माणसाला मोह का होतो? त्याचं उत्तर म्हणजे मोह हा माणसाच्या षडरिपुंपैकी एक आहे जो माणसाचा शाप आहे असे महंत सांगतात. रोजच्या व्यवहारात, राजकारणात याच मोहापोटी काय काय अनर्थ घडतात हे आपणा सर्वांनाच माहित आहे तरी ही तो काबूत का ठेवला जात नाही? याबद्दल मनस्विनीची तक्रार आहे.

दाखवायचा 'मुखवटा' नि 'खरं रूप' वेगळच असतं. धर्माच्या नावाखाली होणारा दान धर्म आणि त्या मागचे खरे कारण वेगळच असतं. याचच उल्लेख तिच्या 'धर्मादाय' कवितेत आहे. चर्चा ही पण याचेच सुधारलेले रूप आहे, चर्चा म्हणजेच वाटाघाटी. यांतून फक्त वेळ, पैसा आणि लोकाच्या आशा यांचा कचरा केला जातो आणि तथ्य काहीच निघत नाही तरीही साध्या सुध्या गोष्टींसाठी ही 'चर्चा' होतात.

स्वार्थी लोकांची हुशारी म्हणजे 'रुमाल' हे रूपक. मनस्विनिने हे अगदी सहज रेखाटले आहे. उत्साही तरुणांची होणारी फसगत तर तिच्या जिव्हारी लागते. गरीबीतून बाहेर पडू इच्छिणाऱ्या आणि व्यवहार न समजणाऱ्या कोवळ्या तरुणांच्या गरजेचा, गरिबीचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन, त्यांच्या हातून आपला फायदा करून घेण्याच्या समाज्याच्या पद्धतीची तिला चीड आहे. हे सर्व समजूनही ती समाज बदलू शकत नाही म्हणून फक्त तक्रार करते, तिला वेदना होतात, ती खिन्न होते. पण तिच्या कवितांत असे प्रश्र्न वारंवार उपस्थित करून ती जनजागृती करून तिचा कामाचा वाटा उचलू इच्छिते.

दु:ख तर माणसाचा पाठ पुरावा करत असतं. जन्मलेलं बाळ जन्मल्याबरोबर रडतं - कारण माहित आहे? त्याला ह्या घाणेरड्या जगात यावसं वाटत नाही, तरीही यावं लागतं म्हणून! दुसरी गोष्ट घ्या - आपल्या देशांत शिक्षणाला एक अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं. परीक्षेच्या तीन तासांत त्यानं वर्षभर केलेल्या अभ्यासाची परीक्षा होते, आणि निकाल जीवनाचा लागतो. किती unfair? 'निकाल' ही कविता याचेच शब्दचित्र आहे.

मनस्विनीला अनेक प्रश्र्न आणि तक्रारी आहेत तरीही बदलत असलेला समाज आणि स्त्रीची आगेकूच तिला दिलासा देते, तिला आशा वाटते. 'निरुत्तरीत' कवितेत याची प्रचिती येते. तिचं स्फूर्ति स्थान कोण याचं उत्तर मनस्विनीला मिळत नाही म्हणून ती त्याच स्त्रीला याचं उत्तर द्यायला सांगते.

प्रश्र्न तक्रारींचा हा सिलसिला जाणण्यासाठी आणि तिच्या प्रश्र्नांना उत्तरे पुरवण्या साठी 'अनुभूति' काव्य संग्रह वाचा आणि facebook वर कॉमेंट्स लिहा. मनस्विनी त्या वाचायला उत्सुक आहे.

Facebook page:  www.facebook.com/pages/मनस्विनी/693942534067869


 

Friday 22 May 2015

अनुभूति: निरीक्षणाबद्दल


नमस्कार!
'निरिक्षण' मग ते कश्याचेही असो, मनस्विनीची एक शक्ती आहे. तिचे निरिक्षण सूक्ष्म - प्रदीर्घ आहे आणि ते ती आपल्या कल्पनेत चपखल बसवते. बहुतेक छोट्या मुलींना बाहुलीचं वेड असत. त्या तिच्यावर जीवापलिकडे प्रेम करतात, त्यांना जपतात. मनस्विनीची 'बाहुली' हे तिच्या मैत्रिणीचे रूपक आहे आणि ती तिच्याशी रममाण होते. स्वातंत्र्य की पारतंत्र्य आवडतं असा सरळ प्रश्र्नच ती विचारते. मनस्विनी अबोल आणि आपल्यातच रमणारी असली तरी तिला खूप हसायचं आहे. म्हणून ती सर्वांना 'मला आवडतं' मध्ये सांगते मला हसायला शिकावा. अशा subtle भावनांचा संबंध मानसिक अवस्थेच्या निरीक्षणाशी आहे. तिचं जीवन 'निर्मल जलधारा' सारखे नितळ आहे हे ती जाणीवपूर्वक आग्रहाने सांगते. तिला पहाटेचा एकांत आणि निरव शांततेत फिरायला आवडते.

जगात अनेक छोटी छोटी गावं विखुरलेली आहेत की जिथे निसर्गाचा अनोखा नजारा तिला मोहवतो. 'गांव' ही कविता अश्याच एका निसर्ग-सुंदर गावाचं निरीक्षण आहे. ती जेव्हा 'सुख' या कल्पनेत रमते, तेव्हां सुख स्वतःमध्येच असतं याची तिला चाहूल लागते आणि त्या दृष्टीने तिचे निरीक्षण वाढते. तिच्या आयुष्यात प्रेम हे तिला न गवसलेला बिंदू आहे तरीही या भावनेचे सूक्ष्म निरीक्षण ही त्रुटी भरून काढते. ऐन तारुण्यात प्रत्येकाला याच प्रेमाच अर्थ कधी न कधी कळतो - कुणी त्यात रमतो तर कुणी वेडा होतो, पण मनस्विनी हे अंत:करणातील प्रेम कर्ता आणि क्रियापद अशा दोन दोन शब्दात, पाल्हाळ न लावता अगदी सहजपणे मांडते.

मनस्विनी जेव्हा आईच्या भूमिकेत जाते, तेव्हा ती आपल्या चिमण्याला 'आशीर्वादाष्टक' म्हणते नि 'आई अजाण बालकाची' होऊन त्यानं नकळत तिला दिलेल्या आनंदाचं detailed वर्णन करते. पक्षांच्या आवाजाचं - भाषेचं वर्णन करून त्यांना बाळाचे मित्र करून टाकते - 'मित्रा' हे बालगीत अडीच तीन वर्षांची, नुकतीच बोलायला लागलेली मुलं सहज आत्मसात करतात.
मानास्विनीच्या सर्वच कविता निरीक्षणात्मक आहेत तरी ह्या निरीक्षण category तील कवितां मध्ये निरीक्षण आणि कल्पना यांचं अप्रतीम मिश्रण आहे. छोट्यांच्यात छोटं होणं तिला सहज जमतं, म्हणूनच त्यांना आवडतील असे विषय आणि शब्द ती वापरते. आईच्या भूमिकेतून मातृत्वाचे समाधान ओत:प्रोत भरलेले दिसते. व्यवहारी जगापेक्षा निसर्गाची ओढ तिला लागलेली दिसते. तिच्या कल्पनेची तरलता या सर्व निरीक्षणातून लिहिलेल्या कवितांमध्ये जाणवते.

रसिक वाचकांनो आपण तिच्या कल्पनांच्या जेवढे जवळ जाल तेवढी तिची ओळख आपल्याला होईल. यासाठी 'अनुभूति' संग्रह वाचा आणि त्यातील तुमच्या आवडी-निवडी कॉमेंट्सच्या रूपानं facebook वर लिहा. म्हणजे मला ब्लोग्स लिहायला खूप मजा येईल. पुन्हा भेटूया…

Facebook page:  www.facebook.com/pages/मनस्विनी/693942534067869

अनुभूति: Feelings बद्दल


'अनुभूति' काव्य संग्रहात मनस्विनीचे विविध मूड जाणवतात. प्राण्यांना भावना असतात आणि माणूस तर प्रगल्भ बुद्धीचा, संस्कारीत जीव. मग त्याची भावना ही अधिक तीव्र, अधिक सूक्ष्म असणं स्वाभाविक आहे. त्याला भाषा आहे, त्याला लिहिता वाचता येतं आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर तो भराऱ्या मारतो. त्यांच्याद्वारे तो भावना रंगवतो, खुलवतो. सृष्टीतील गोष्टी तो आपल्या भावनांशी जोडतो, त्यांतील साम्य, तफावत आणि विसंगती तो शोधू शकतो. कविता कथा लिहू शकतो. मनस्विनिच्या भावनाही निसर्गाशी आगदी निगडीत आहेत. निसर्गात पडणाऱ्या पांढऱ्या शुभ्र बर्फाचे नि तेव्हाच्या निसर्गाचे वर्णन यांची तुलना आपल्या वृद्धावस्थेशी करते. त्याद्वारे ती वाचकांना आपली मने चिरतरुण ठेवायला सांगते.

प्रयत्नपूर्वक आपली इच्छा पूर्ण झाल्यावार तिला 'मुक्ती' मिळाल्यासारखं वाटतं, ती आनंदी होते. मनस्विनीच्या कवितांत कित्येक भावनांच्या लहरी तरळतात. मुक्ती सर्वोच्य पण त्याआधी समाधान, स्नेह, कृतज्ञता, परोपकार, अनुकंपा, राग, आलोचना, तिरस्कार, भय आदि भावना ती अनुभवते.

लहानपणीच्या आपल्या कल्पना ह्या कल्पनाच असतात. जरा वय वाढल्यावर, दुनियेचे खरे रूप समजू लागल्यावर काही कल्पना चूक असल्याची 'अनुभूति' तिला होते. Reality आणि आपली कल्पना ह्यांतील तफावतीत भावनांचा उगम होतो. पुढे परिस्थिती आणि वातावरणाने ह्या भावना बदलत रहातात आणि मनस्विनी परिपक्व होत जाते. गम्मत पहा, ती nature जाणते आणि मग निसर्ग तिला अधिक कल्पना देतो. तिचा सर्वांगीण विकास होतो. बालपणातील चुकाही तिला कळतात त्यामुळे ती अचानक गंभीर होते. आपल्या जीवनातील चुका प्रत्येकाने दुरुस्त केल्या पाहिजेत अस तिला वाटतं,'टारगट' कविता याचेच प्रतिक आहे. जाता येता तिचे निरीक्षण असं सुचवतं की चालू घडिला समाजात असणाऱ्या प्रथा किंवा न मिळणारं व्यवहाराचं शिक्षण हे घातक आहे. या बद्दल ती कडक आणि बिनधास्त बोलते. Corrupt झालेल्या सामाजिक प्रथांचा तिला राग आहे हे तिच्या 'विदारक' 'परीक्षा' कवितांत स्पष्ट जाणवते. सासर माहेर यांचं जेष्ठ कनिष्ठ नातं का केलं जातं याचं उत्तर ती शोधते आणि दोन्हीकडची नाती स्वत:च्या वाढीसाठी किती निगडीत आहेत हेही तिला पटते. तरीही प्रत्येक नात्यानं आपली मर्यादा ओलांडायची नसते हे ही तिला जाणवते.

मनस्विनिच्या सर्वच कवितेत तिचे deep feelings दिसतात पण काही कविता feelings बद्दलच आहेत. त्या वाचताना तिच्या खऱ्या स्वभावाचे दर्शन होते. मुळात भावनाप्रधान असलेली मनस्विनी कर्तव्यपूर्तीसाठी कशी कणखर होत जाते हे वाचकांना जाणवेल.

'अनुभूति' तील कविता जरूर वाचा, विविध भावनांचा आस्वाद घ्या आणि facebook वर कॉमेंट्स टाकायला विसरू नका!