Saturday 30 May 2015

अनुभूति : टीचरची भूमिका

मनस्विनी teacher म्हणून तिच्या जवळपासच्या समाजाकडे पहाते, तेव्हा त्या समाजाची वैशिष्ठ्ये व मुले वाढविण्याच्या त्यांच्या पद्धती पहाते. अबोध, निष्पाप मुले ही त्यांच्या पालकांचे प्रतिबिंब असतात. मुलांच्या खास गरजा तिच्या निरीक्षणात आल्या. या सर्वाचे हुबेहूब वर्णन या सत्यकथेवर आधारित कवितांमध्ये साफ दिसते.

मुंबईत व्यापारी वर्ग बराच मोठा आहे. त्यांचे फायद्याचे व्यवहार न कळत त्यांची मुले कशी आत्मसात करतात हे बघण्याजोगे आहे. 'अखेर व्यापारीच' असं आपणही म्हणाल. स्वतः च्या अधुपणान स्वतः च्या मुलांनाच त्रास देणाऱ्या व्यक्ति किंवा मनाविरुद्ध समाजाच्या बंधनाने चिडणारा बाप असो, 'हाच मुलाचा बाप' आणि 'असाही जन्मदाता' या कावितातांमध्ये भेटतो. 

टीचरच्या कडक पण प्रेमळ शिस्तीने समज आल्यावर सुधारलेले तिचे विद्यार्थी आपल्याला 'अशीही कृतज्ञता' किंवा 'स्वगत यशानंतर' येथे भेटतात. मनस्विनीला असं मिळालेलं प्रेम हीच तिची गुरुदक्षिणा ती मानते. सामाजिक प्रतिष्ठेपायी आपल्याच मुलांचं होणारं नुकसान 'चूक कुणाची भोग्तं कोण?' इथे जाणवते. त्यांच्या चुकीच्या धोरणांनी, कित्येकवेळा मुलं आपल्या आवडीचं करता (शिकता) येणार नाही म्हणून निराश होतात. कधी नशिबाचा फटका बसल्यानं निर्दोष मुलांना होणारी शिक्षा मनस्विनीला धक्का देते आणि तिच्या मनात 'असं कां?' हा प्रश्र्न उभा रहातो. 'गुड मेमरी'ही साधी कविता तर 'खुळ्या मुली' ही स्त्रीच्या आत्मकेंद्री असण्याच्या सवयीला चिमटा काढणारी कविता आहे. जुळ्या मुला-मुलींच्या जन्मतः गरजा आणि सवयी 'माझे शोधन' मध्ये ती नमूद करते.  

मुलांची मोकळी मने नि जगातील अलिखित पद्धती 'रीत ही जगाची' मध्ये आपल्या पुढे येतात. स्त्रिविवाह किंवा विवाह उशिरा होण्यानं तिची होणारी कुचंबणा येथे मनस्विनीने प्रकर्षाने मांडली आहे. समाजाच्या रीती कश्या आडव्या येतात याचे उदाहरण 'रमा कुंभार' आहे. काही लोकं स्व-खेरीज कशाचाही विचार करत नाहीत हे पाहिल्यावर मनस्विनीच्या मनात हे लोकं 'स्वार्थी की अडाणी' असा प्रश्र्न उभा रहातो. तरीही तिचे निरीक्षण सतत चालू आहे. तिने काढलेले निष्कर्ष तिची विचार समर्थता दाखवते.

सामाजिक रूढी, रिती रिवाज, समज आणि त्यांचे विपरीत परिणाम झालेले आपल्याला दिसतात. ती चूक नजरेस येताच ती त्वरित सुधारावी म्हणजे अनर्थ टळतो अशी शिकवण मनस्विनी देते. नुसती बडबड करून, टीका करुन मनस्विनी स्वतः काय करते असा प्रश्र्न कदाचित आपल्याला पडेल. शक्य तेव्हा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये समजौता घडवून आणून प्रश्र्न मार्गस्थ करते, दोन्ही पक्षांना emotional support पुरवते.

या कविता अनुभूति काव्य संग्रहात वाचा आणि मुलांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्यात तर या कविता लिहिणे सार्थकी लागले असे मला वाटेल. Facebookवर तुमचे अनुभव / मतं लिहायला कचरू नका, सर्वांना उपयोगी पडतील.



 

No comments:

Post a Comment